चंद्रपुराच्या या चमत्कारिक बोअरवेलनी सगळेचं हैराण,लोक देवासारखं दर्शन घेतात-पुजाही करतात; त्यामागचं कारणही आहे अनोख
चंद्रपूर : रोपवाटिकेसाठी वनविभागाने बोअरवेलसाठी खड्डा मारला. या बोअरवेलमधून अचानक पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर येवू लागला. १० दिवसांपासून या बोअरवेलमधून पाणी वाहत आहे. मंदिर परिसरात ही बोअरवेल असल्याने याला लोकांनी शंकरदेवाचा जटा आहेत, असे समजून माथा टेकाला. मात्र, या मागील खरं कारण अभ्यासकांनी सांगितलं आहे.
जिल्हातील पोंभुर्णा तालुक्यात येणाऱ्या उमरी पोतदार इथे पांढरी माती देवस्थान आहे. या देवस्थानाजवळच वनविभागाची रोपवाटिका आहे. रोपवाटीकेला सिंचन करण्यासाठी वनविभागाने बोअरवेलसाठी खड्डा मारला. १५० फूट खोल खड्डा मारल्यावर त्यातून पाण्याचा मोठा प्रवाह सुरू झाला. दहा दिवसापासून या बोअरवेलमधून पाणी सतत वाहत आहे. बघणाऱ्यांना हा चमत्कार वाटला. काहींनी याची पूजा केली.
ही आहे आर्टिझन वेल…
वैज्ञानिक भाषेत याला आर्टिझन वेल असं म्हणतात. एखाद्या जमिनीच्या भूभागामध्ये जर कठीण खडक असेल जिथले पाणी खाली झिरपत नाही. त्यावरचा खडक हा जर वाळूचा खडक असेल ज्याला सेडिमेन्टेड रॉक म्हणतात. जर त्याचा आकार एखाद्या कपबशीसारखा असेल तर तिथे पाणी गोळा होते, आणि त्याचा दाब हा उच्च असतो. अशा ठिकाणी बोअरवेल असेल तर अशा ठिकाणी पाणी सतत वाहत असते. या परिसरात असे अनेक आर्टिझन वेलचे प्रकार आहेत, असे अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितलं.
रोपवाटिका फुलणार…
सतत वाहणाऱ्या या बोअरवेलचा पाण्याचा वापर रोपवाटिकेसाठी होणार असल्यामुळे रोपवाटिका फुलणार आहे. सोबतच या वनक्षेत्रात असणाऱ्या वन्यजीवांची तहानही भागवणार आहे.
कन्हारगाव अभयानातही आर्टिझन वेल…
नव्याने घोषित झालेल्या कन्हारगाव अभयारण्यात दोन आर्टिझन वेल आहेत. १२ ही महिने यातून पाणी वाहत असतें. या बोअरवेल आकर्षणाच्या केंद्र ठरल्या आहेत.