जय वीरुचा करुण अंत; बारामतीत २ जीवलग मित्रांनी काही तासाच्या अंतरानी सोडले प्राण, सारेच हळहळले

बारामती : समाजात रक्ताची नाती अनेक आहेत. मात्र मैत्री ही रक्ताच्या नात्या एवढीच किंबहुना त्याहून अधिक श्रेष्ठ असल्याची अनेक उदाहरणं आपण ऐकली व पाहिली आहेत. संकट समयी अनेकदा रक्ताची नाती दूर जातात. मात्र रक्ताचं नातं नसलं तरी, रक्ताच्या नात्याप्रमाणे आपल्याला जवळ करते ती मैत्री. याची प्रचिती अनेकांना अनेकदा येते.

अनेकांची मैत्री इतकी घट्ट असते की एकमेकांसाठी आपला जीवही द्यायला तयार असतात. अशीच घट्ट मैत्री असलेल्या आणि त्यामुळेच जय वीरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मित्रांचा एकाच दिवशी काही तासाच्या अंतरानं मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.जीवश्चकंठश्च मित्राचा सकाळी हृदयविकारानं मृत्यू झाल्याचं समजताच सायंकाळी दुसऱ्या मित्रानंदेखील प्राण सोडले. त्यांनादेखील हृदयविकाराचा झटका आला.

पुण्यातील बारामतीत ही घटना घडली. बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्यात काम करणारे रामचंद्र किसन कोरडे व त्यांचे जीवलग मित्र अशोक गणपत होळकर या दोघांचं हृदयविकारानं निधन झालं. कारखान्यात जय-विरु या नावानं प्रसिद्ध असलेली कोरडे-होळकर यांच्या निधनानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रामचंद्र कोरडे (वय ४९) यांचं १७ एप्रिलला हृदयविकारानं निधन झालं. तर त्यांचे जीवलग मित्र अशोक होळकर यांचं त्याच दिवशी सायंकाळी हृदयविकारानंच निधन झालं. रामचंद्र कोरडे हे बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथून सोमेश्वर कारखान्यात कामाला येत होते, तर अशोक होळकर हे बारामती तालुक्यातील होळ (पाटीलवाडा) येथून कारखान्यात कामाला येत होते. या दोघांच्या वयात नऊ वर्षांचा फरक असला तरी त्यांची जिगरी मैत्री सगळ्यांना माहीत होती.

विशेष म्हणजे हे दोघे सोमेश्वर कारखान्यात एकाच दिवशी म्हणजे १९ ऑक्टोबर २००१ रोजी असिस्टंट फायरमन पदावर रुजू झाले होते. एकत्र काम, एकत्र जेवण, एकत्र फिरायला जाणं, एकमेकांच्या सुखदुःखात सामील होणं, यामुळे त्यांची मैत्री घट्ट होत गेली. दोघांनी अवघ्या काही तासांच्या अंतरानं जगाचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून परिचित हळहळले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *