धुमधडाक्यात लग्न लावलं, वाजत-गाजत वरात आणली, पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नववधूचा खरा चेहरा समोर आला
उत्तर प्रदेशः धुमधडाक्यात लग्न लागलं, नववधूला वाजत गाजत घरी घेऊन आले. गावकऱ्यांना जेवण दिलं. मात्र दुसऱ्या दिवशी नववधुने केलेल्या कृत्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सकाळी उठताच नवीन नवरी घरात कुठेच सापडली नाही. त्यानंतर घरच्यांनी एकच शोधाशोध केली गावात ही खबर वाऱ्यासारखी पसरली.
घरात आणि गावात शोध घेतल्यानंतर तरुणी कुठेच सापडली नाही. तेव्हा नवरदेवाने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी शोध घेताच भयानक सत्य समोर आलं.उत्तर प्रदेशमधील मेरठमधील रोहटा गावात राहणाऱ्या राजवीर सिंह हे मुलगा आशीषचं लग्न जमवण्याच्या प्रयत्नात होते. मुलाचं वय ४२ झालं तरीही त्यांचे लग्न होत नसल्याचं पाहून त्याचे कुटुंबीयही हैराण होते.
त्याचवेळी नातेवाईंकापैकी एकाने उत्तराखंडमधील हल्दानी येथील एका व्यक्तीचे नाव सांगून तो लग्न जमवून देऊ शकतो, असं सांगितलं. त्या मध्यस्थी करणाऱ्या माणसाने आशीष आणि त्याच्या कुटुंबीयांना सीमा नावाच्या मुलीचं स्थळ दाखवलं. ती हल्दानी येथे राहणारी आहे. मुलाकडच्यांना मुलगी पसंत पडल्यानंतर लग्नाची तारीख पक्की केली.
त्यानंतर घरगुती पद्धतीने ५ एप्रिल रोजी हल्दानी येथे त्यांचं लग्न झालं. त्याचदिवशी वरातही निघाली आणि नववधू सासरी आली.मुलाचं लग्न झाल्याने कुटुंबीयदेखील खुश होते. घरात आनंदाचे वातावरण होते. नववधूदेखील आनंदी होती. मात्र तिच्या या आनंदी चेहऱ्यामागे मोठा कट रचला जात होता. याची कोणाला कानोकान खबरही नव्हती.
सगळेच लग्नाच्या जल्लोषात मग्न होते. नववधू सीमा लग्नानंतरची एक रात्र सासरीच राहिली होती. त्यानंतर ६ एप्रिलला रात्री सीमा घरातील रोख रक्कम व दागदागिने घेऊन पसार झाली. नवरी घरात नसल्याचे कळताच एकच गदारोळ माजला.गावात ही खबर पोहोचली. तिला शोधण्याचा खूप प्रयत्न झाला मात्र ती काही सापडली नाही.
त्याचवेळी गावातील काहींनी तिला एका व्यक्तीसोबत दुचाकीने बाहेर पडताना दिसली. त्यानंतर आशीष आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. मेरठचे एसपी देहात कमलेश बहादूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत कुटुंबीयांच्या आरोपांनुसार नववधू दागिने आणि पैसे घेऊन पसार झाली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून तपासात जे सत्य समोर येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल.