रंजना कधीच चालणार नाही हे पाहून निर्मात्याच्या पायाखालची जमीनच सरकली…पंढरीची वारी चित्रपटाच्या खास आठवणी
आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुर नगरीत वैष्णवांचा सागर अवतरला आहे. इतके दिवस पायी चालत विठुरायाच्या दर्शनाची आस लागून राहिलेली भक्त मंडळी आज त्याच्या दर्शनाने धन्य झाली आहेत. तर टीव्ही माध्यमातून सुद्धा घरबसल्या प्रेक्षकांना विठुरायाचे दर्शन मिळत आहे.
या दिवसाचे आणखी एक खास वैशिष्ट्य असे की या दिवशी सह्याद्री वाहिनीवर हमखास “पंढरीची वारी” हा अविस्मरणीय चित्रपट दाखवला जातो. हा चित्रपट १९८८ सालापासून प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.या चित्रपटाच्या काही खास आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देऊयात. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रमाकांत कवठेकर यांनी केले होते तर चित्रपटाची निर्मिती अण्णासाहेब घाटगे यांची होती. हा चित्रपट बनवण्यासाठी अण्णासाहेब घाटगे यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
खरं तर हा चित्रपट जयश्री गडकर यांच्याअगोदर रंजना करणार होत्या.चित्रपटाचे आळंदी ते पंढरपूर मार्गे असे ७० टक्के काम पूर्ण झाले होते. पण दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगला जात असताना रंजनाचा अपघात झाला. त्यावेळी हा चित्रपट रंजनानेच करायचा असा अट्टाहास अण्णासाहेब घाटगे यांचा होता. अपघातानंतर रंजना यांच्यावर छोटी मोठी अशी २५ ऑपरेशन झाली होती.
दरवेळी त्या आता चालायला लागतील असा विश्वास अण्णासाहेबांना होता. मात्र दोन वर्षे झाली तरीही रंजना अंथरुणाला खिळुन राहिल्या. अण्णांच्या सर्व नातेवाईकांनी त्यांना हा चित्रपट सोडून देण्याचा सल्ला दिला. अखेरीस रंजना आता पुन्हा कधीच चालणार नाही हे कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण अण्णासाहेबांनी हा चित्रपट बनवण्यासाठी होता नव्हता तेवढा जवळचा सर्व पैसा खर्च केला होता. त्यावेळी त्यांना हा चित्रपट बनवण्यासाठी १८ लाख रुपये खर्च आला होता.
चित्रपटात अरुण सरनाईक यांचीही मुख्य भूमिका होती मात्र अपघातात झालेल्या यांच्या निधनाने देखील अगोदरच दोन वर्षे अशीच गेली होती. विठुरायासाठी चित्रपट तर पूर्ण करायचा हा ठाम निर्णय घेऊन दोन वर्षे वाट पाहिल्यानंतर रंजना यांची परवानगी घेऊन अण्णासाहेब घाटगे यांनी ही भूमिका जयश्री गडकर यांना देऊ केली. चित्रपटाचे पोस्टर ठरले होते त्यात रंजना छोट्या बकुल कवठेकरला खांद्यावर घेऊन उभ्या असतात.
हे पोस्टर बदलण्यात आले. झालेल्या नुकसानाची तमा न बाळगता चित्रपट पुन्हा एकदा नव्याने चित्रित करण्यात आला. २८ डिसेंबर १९८८ अखेच चित्रपटाच्या प्रदर्शनाचा तो दिवस उजाडला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली. धरिला पंढरीचा चोर ही गाणी आसमंतात दुमदुमू लागली. जयश्री गडकर, बाळ धुरी, राजा गोसावी, राघवेंद्र कडकोळ, दिनानाथ टाकळकर, सुरेश विचारे, आशा पाटील, नंदिनी जोग, बकुल कवठेकर, अशोक सराफ, अनुप जलोटा यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
विठुरायाच्या रूपातला बकुल कवठेकर हा चिमुरडा न बोलताही केवळ चेहऱ्यावरील हावभावावरून प्रेक्षकांना रडवून गेला. अण्णासाहेब घाटगे यांचा मुलगा निशांत घाटगे हे या चित्रपटाचे साक्षीदार आहेत. या चित्रपटाच्या आणि रंजना सोबतच्या अनेक आठवणी त्यांच्याजवळ आहेत. हा चित्रपट आठवला की रंजना आत्याबद्दल ते नेहमी भरभरून लिहितात. आज आषाढी एकादशीनिमित्त चित्रपटाची ही खास आठवण तुम्हाला जाणून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल.