सातार्यात पती देशासाठी शहीद; मात्र वीरपत्नी शासकीय कार्यालयात २ वर्षांपासून हेलपाटे मारतेय
सातारा: दुष्काळी माण तालुक्यातील जाशी गावचे सुपुत्र चंद्रकांत गलांडे हे सात वर्षांपूर्वी भारतीय सेनेमध्ये सेवेत शहीद झाले होते. त्यांच्या पत्नी निशा गलांडे यांना राणंद येथे शासकीय जमीन मिळाली आहे. मात्र गट नंबर ११६१ या जमिनीची कब्जेपट्टीप्रमाणे विभक्त सातबारा करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून दहिवडी येथे भूमीअभिलेख कार्यालयात हेलपाटे मारत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निशा चंद्रकांत गलांडे (रा. जाशी) यांना सरकारी जमीन मिळाली आहे. या जमिनीचे कब्जेपट्टीप्रमाणे विभक्त सातबारा या कामासाठी भूमीअभिलेख कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.
याबाबत निशा गलांडे म्हणाल्या, शहीद जवानाच्या पत्नीला प्रशासन आणि शासकीय अधिकारी अजिबात सहकार्य करत नाहीत. मुलांच्या शिक्षणाच्या कामानिमित्त मी पुण्यात राहते. दहिवडी येथे शासकीय तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय, अभिलेख कार्यालयात गेल्या दोन वर्षापासून हेलपाटे मारत आहे. मात्र, प्रत्यक्ष न्याय अजूनही मिळत नाही. प्रशासनांकडून न्याय न मिळाल्यास सातारा येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
दहिवडी येथे भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी सातत्याने गैरहजर असतात. कर्मचारी मला अजिबात सहकार्य करत नाहीत. या भागातील लोकप्रतिनिधी मला शासकीय कामात सहकार्य करत नाहीत. माजी सैनिक आणि भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेल्या सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय कामानिमित्त अनेकदा हेलपाटे मारून न्याय मिळत नाही.
जाशी गावालगतच्या शेतात चंद्रकांत गलांडे यांची स्वतंत्र वस्ती असून तिथे चंद्रकांत यांचे वडील शंकर, आई सुलाबाई, पत्नी निशा, मुलगा श्रेयस आणि जय असे कुटुंब कायम राहते. चंद्रकांत हे २००४ मध्ये ते लष्करात भरती झाले होते. ते आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये देशसेवा करत होते. चंद्रकांत यांचे लग्न २१ नोव्हेंबर २०११ रोजी झाले. काश्मीर खोऱ्यात लान्स नायक चंद्रकांत गलांडे हे ३० सप्टेंबर २०१७ रोजी शहीद झाले आहेत.
माण तालुक्यातील जाशी येथील तब्बल २० जवान देशाचे रक्षण करत आहेत. या छोट्याशा गावातून तब्बल वीस सुपुत्र देशसेवेत भरती झाले आहेत. त्यामध्ये चंद्रकांत यांचे मोठे बंधू मंज्याबापू गलांडे, लहान भाऊ केशव गलांडे, विकास चोरमले, संतोष गलांडे, धनाजी बळीप, प्रल्हाद बळीप, छगन साळुंखे, श्रीमंत साळुंखे, केशव साळुंखे, मनोहर पवार, दीपक रूपनवर, पोपट बळीप, रामचंद्र पवार, ज्ञानदेव लवटे, पोपट खाडे, प्रकाश पवार, अंकुश गलांडे, प्रमोद ओंबासे यांचा समावेश आहे.