१३ दिवसांपुर्वी आगीत खाक झालेलं कुंटुब झालं अचानक जिवंत, भावबंद हैराण अन् खरा कारनामा ऐकुन गाव कोमात

रायपूर: कुटुंबाला वाचवण्यासाठी एखादी व्यक्ती काय करू शकते हे आपण दृश्यम सिनेमात पाहिलं. आता अशीच एक घटना छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात घडली. आपल्या डोक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी एका व्यक्तीनं कुटुंबाला संपवण्याचा बनाव रचला. विम्याचे पैसे मिळवण्यासाठी त्यानं अतिशय थंड डोक्यानं, नियोजनबद्ध पद्धतीनं काही घटना घडवून आणल्या.

१ मार्चला एका कारला आग लागते. कारला आग लागल्यानंतर कारमधील चार जणांचं कुटुंब अचानक बेपत्ता होतं. ही कार समीरण सिकदार नावाच्या व्यक्तीची असते. यानंतर १३ मार्चपर्यंत कुटुंबाचा ठावठिकाणा लागत नाही. बेपत्ता झालेलं कुटुंब त्यांच्या पखांजूरमधील घरात असल्याचं पोलिसांना कळतं. त्यानंतर पोलीस चार जणांच्या कुटुंबापर्यंत पोहोचतं.

समीरण सिकदारवर ३५ लाखांचं कर्ज होतं. अनेक जण पैसे परत मिळावेत यासाठी यासाठी समीरण यांच्या मागे लागले होते. त्यामुळे त्यानं स्वत:सह संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूचं नाट्य रचलं. मृत्यूनंतर विम्यापोटी ७२ लाख रुपये मिळतील आणि घेतलेलं कर्ज फेडता येईल, अशी योजना त्यानं आखली होती. मात्र १३ दिवसांत त्याचा पितळ उघडं पडलं.

समीरणची कार जळालेल्या अवस्थेत सापडली. मात्र त्यात कोणाचेही मृतदेह नव्हते. समीरणची कार चारामामध्ये जंगलात आढळून आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि कुटुंबाचे मोबाईल ट्रेस केले. तेव्हा समीरण प्रयागराज, पाटणा, गुवाहाटी, रांची, संबलपूरमध्ये प्रवास करत आपला ठावठिकाणा सातत्यानं बदलत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

समीरण आणि त्याच्या कुटुंबाला शोधण्यासाठी पोलिसांनी ९ लाखांपेक्षा अधिक मोबाईल नंबर आणि १ हजारांहून अधिक सीसीटीव्हींमध्ये कैद झालेलं फुटेज तपासून पाहिलं. पोलीस आपला शोध घेत असल्याचं समजताच समीरण त्याच्या घरी परतला. पोलिसांनी त्याला घरातूनच अटक केली. डोक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी कुटुंबाच्या मृत्यूचा बनाव रचल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं.

१ मार्चला रायपूरहून परतत असताना समीरण धमतरीमधील एका हॉटेलात थांबला. तिथे कुटुंबाला सोडून तो चारामाच्या दिशेनं गेला. तिथे त्यानं कार रस्त्याच्या शेजारीच असलेल्या एका झाडाला धडकवली. कारला आग लावली, अशी माहिती कांकेरचे पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी दिली.

कार पेटवल्यानंतर समीरणनं बस आगार गाठलं. तिथून बस पकडली आणि पुन्हा धमतरीला आला. तिथून त्यानं कुटुंबाला सोबत घेतलं आणि अनेक शहरांची यात्रा केली. हे कुटुंब सर्वात शेवटी एका फोटो स्टुडियोत दिसलं होतं. त्यांचा मोबाईल बंद होता. त्यांनी प्रयागराजमध्ये एक हँडसेट घेतला. पोलिसांनी त्यांचं लोकेशन शोधलं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *