२ दिवसांपुर्वी आई गेली, नंतर बाबानीही साथ सोडली; संभाजीनगरमध्ये ४ लेकरं उघड्यावर आली
औरंगाबाद: 2 दिवसांपुर्वी पत्नीने शेतात विष प्राषण करत आत्महत्या केल्यानंतर पतीनेही शेतातील झाडाला गळफास घेत जीवनाचा शेवट केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील धावडा गावात समोर आली आहे.या दोघांच्या आत्महत्येने त्यांची ४ मुलं पोरकी झाली आहेत.या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सुरेखा संतोष दळवी(वय -४१), संतोष किसन दळवी(वय -४५ रा.धावडा, ता. सिल्लोड, जि.औरंगाबाद) अशी मयतांची नावं आहेत.
दळवी कुटुंबाची एकुण ३ एकर शेती आहे.त्यांना २ मुलं, २ मुली अशी चार अपत्ये आहेत.२० तारखेला सकाळी सुरेखा यांनी विषारी औषधीचं सेवन केलं.त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.मात्र,सुरेखा यांनी आत्महत्या का केली,याचे कारण अद्याप उघडं झालेलं नाही.
या घटनेला दोन दिवस उलटत नाही तर सकाळी पती संतोषने देखील शेतातील झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच गावकऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.मात्र, तपासुन डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
२ दिवसात पती-पत्नी दोघांनी आत्महत्या का केली,हे अद्याप समोर आलेलं नाही.मात्र,कुटुंबाने बचत गट आणि खाजगी कर्ज घेतले असल्याचं सांगितलं जात आहेत.पती-पत्नी दोघे गेले मात्र त्यांच्या पश्चात असलेल्या ४ मुलांचे छत्र हरपले आहे.त्यांचे पुढील शिक्षण आणि पालन-पोषण कोण करेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.